पंजाबसह राज्यातून आलेल्या 250 संकरित गाई कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण
दुग्ध व्यवसाय वाढीसाठी कृषी प्रदर्शन मार्गदर्शक-- रणजीतसिंह देशमुख


संगमनेर (प्रतिनिधी)–शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये पंजाब सह राज्यभरातून आलेल्या विविध 250 गाई यांची झालेली सौंदर्य व दुग्ध स्पर्धा ही मुख्य आकर्षण ठरली असून या प्रदर्शनातून दुग्ध व्यवसाय वाढीला प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात कळस कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये ही भव्य सौंदर्य व दुग्ध स्पर्धा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी समवेत सौ शरयूताई देशमुख,प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर गोरख नवले विलासराव वर्पे विष्णू ढोले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिल्लारी , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. जी.बी. बाचकर आदी उपस्थित होते.
या डेअरी प्रदर्शनामध्ये दुग्ध व सौंदर्य स्पर्धा झाली असून यामध्ये पंजाब राज्यासह राज्यभरातील 250 गाईंनी सहभाग नोंदवला आहे . अत्यंत सुंदर असलेल्या कालवडी गाई पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये 55 लिटर दुग्ध देणारी गाय ही आकर्षण ठरली.
जर्सी गाई मध्ये दोन ते चार वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक पारनेर येथील अविनाश शिंदे, द्वितीय क्रमांक कळस येथील अशोक वाकचौरे आणि तृतीय क्रमांक वडगाव लांडगा येथील हरीश लांडगे यांच्या गाईंनी मिळवला तर होस्टेल गाईंमध्ये जोर्वे येथील प्रतीक थोरात यांच्या गाईने तर द्वितीय क्रमांक वैजापूर येथील प्रशांत चव्हाण यांच्या गाईने मिळवला आणि तृतीय क्रमांक सिन्नर येथील सुभाष आव्हाड या शेतकऱ्याच्या गाईला मिळाला.
याप्रसंगी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो दुधामुळे अनेक कुटुंबांमध्ये स्थैर्य निर्माण झाले असून या व्यवसायात कमी श्रमात जास्त दूध उत्पादन होण्याकरता अशा कृषी व डेअरी प्रदर्शनाची गरज आहे यातून शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळणार आहे तीन दिवस हे प्रदर्शन खुले राहणार असून आपल्या तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन जीबी बाचकर यांनी केले तर सागर वाकचौरे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या गाईंना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
